भगवान महावीर जयंती
भगवान महावीर जयंती
अलोक पवार
महावीर चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करण्यासाठी नेहमीच विविध स्थानांवर जायचे. जाताना सोबत त्यांचे विद्यार्थी नेहमीच असायचे. विद्यार्थी महावीर यांच्याकडून काय काय शिकता येईल या गोष्टीचा नेहमी विचार करायाचे. तसे महावीरांचे सर्व विद्यार्थी, साधक हे त्यांच्याप्रती भरपूर प्रेम, आदर निष्ठा ठेवून वागायचे. पण त्यातील एक जण एके वेळी त्यांच्यावर नाराज होता. महावीर कसे चुकीचे असू शकतात, याची तो महावीरांकडून अशी काही कृती घडते का यांच्याकडे लक्ष ठेवून असायचा.
एका दिवशी महावीर आणि त्यांचा तो विद्यार्थी दोघेही जंगलमार्गी एका सभेला निघाले. जंगलामधील एका रोपला बघून तो विद्यार्थी महावीरांना म्हणाला, "या रोपाला कधी भविष्यात फुले लागतील". महावीर यांनी आपले डोळे मिटले. थोडा गहिवर विचार करून पुन्हा डोळे उघडून महावीर म्हणाले, " येणार नक्की येणार".
त्या शिष्याने कुच्छित वृत्तीने ते रोप उपटले आणि तेथे फेकले. आणि हसतंच म्हणाला, "महाराज मी हे रोप उपटले आता ह्याला कसे काय फुल लागणार". महाराज त्याच्या प्रवृत्ती कडे बघून काहीच न बोलता आपल्या पुढच्या मार्गांकडे चालू लागले. शिष्य देखील त्यांच्या मागे चालू लागला. शिष्य मनातल्या मनात मी भगवान महावीरांना चुकीचे ठरवले, या निश्चयाने हसत होता.
त्या वेळेस पाऊस भरपूर पडू लागला. कसे बसे गुरु शिष्य सभा स्थळी पोहोचले. पण पाऊस जास्त असल्याने ते जवळ जवळ एक आठवडा सभा स्थळीच थांबले. पाऊस ओसरल्यावर ते पुन्हा आल्या वाटेने मार्गक्रमण करित चालू लागले. ते वाटेत त्याच ठिकाणी आले ज्या ठिकाणी शिष्याने ते झाड उपटून टाकले होते.
ते झाड अगदी हिरवेगार झाले होते. फुलांनी बहरले होते. भगवान महावीरांनी त्या शिष्याला सांगितले तु जरी त्या झाडाला उपटले तरीही त्यामध्ये जगण्याची लढण्याची उमेद होती. त्याच्या मुळानी पुन्हा जीव धरला. आणि आज बघ ते कसे फुलांने बहरले आहे. तुझ्या प्रश्नाच्या उत्तराचे समाधान झाले असावे. तो शिष्य अगदीच नरमला. त्याला भगवान महावीरांची महानता लक्षात आली.
गुरुवर निस्सीम भक्ती करणे हे शिष्याने केलेच पाहिजे. गुरूंवर विश्वास ठेवणे हे देखील महत्वाचे आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे आदयगुरू. त्यांच्या अशा बऱ्याच मार्गदर्शक् गोष्टी आहेत.

Comments
Post a Comment